UNLOCK ::04
महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम, नियमावली जाहीर
जिल्हाबंदी उठवली
राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द
मुंबई:( कारंजा वृत्तकेसरी)
राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे लोकांना आता आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंदिरं आणि जिम यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली नाही. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि कोणत्या बंद राहणार आहेत.
काय राहणार बंद ?
१) शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार २) चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम ३) आंररराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली असेल तर मुभा ४) मेट्रो बंदच राहणार ५) सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम
काय काय राहणार सुरु ?
१) हॉटेल आणि लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी २) खासगी कार्यालय क्षमतेच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु करु शकतात. ३) प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द. प्रवासासाठी परवानगीची आवश्यकता नाही. ४) खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी ५) कोणत्याही अटीविना शारिरीक हालचालींसाठी परवानगी.