राज्यात अडकलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाता येणार त्या करिता येत्या सोमवारपासून काही अटींवर एसटीतर्फे मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार --परिवाहन- राज्यमंत्री सतेज पाटील

राज्यात अडकलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाता येणार . येत्या सोमवारपासून काही अटींवर एसटीतर्फे मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार --- परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील


आता राज्यातच इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी होणार मोफत सोय .


 मुंबई : ( कारंजा वृत्तकेसरी) दि 9 में


      कोरोना च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकले असून त्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आता राज्यात अडकलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाता येणार आहे. येत्या सोमवारपासून काही अटींवर एसटीतर्फे मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.          आत्तापर्यंत राज्यातून परराज्यांमध्ये जाण्यासाठी रेल्वे आणि बसची सोय करण्यात आली होती. मात्र आता राज्यातच इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे.


   दरम्यान, आपल्या गावी परत जाण्यासाठी एसटीने काही नियम तयार केले आहे. ज्यांचे पालन प्रवाशांना करणे अनिवार्य आहे. यात सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी असेल. म्हणजेच एका बसमध्ये 21 ते 22 लोक बसू शकतात. त्यामुळे प्रवासासाठी जर 21- 22 लोकांचा ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावा.  तसेच, ज्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.


ज्या नागरिकांना वैयक्तिक जायचे आहे, त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करावी. हे पोर्टल सोमवार पासून चालू होईल. ऑनलाईन अर्ज करताना, आपण सध्या ज्या जिल्ह्यात आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बस मध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे अनिवार्य आहे. तसेच बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.


महत्वाचे म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच क्वारंटाईन करण्याचे अधिकारी तेथील नोडल अधिकाऱ्यांकडे असतील. ही सेवा पॉईंट टू पॉईंट असेल. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. तसेच गाड्या जेवणासाठीही थांबणार नाही, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील. दरम्यान, कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार नाही. तसेच ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे, सर्वांनी या नियमांप्रमाणे योग्य माहिती भरून जाण्याचा मार्ग सुकर करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.